SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
दत्त स्तवम्‌ – श्लोक ८

अतिशय खोलवर अर्थ असलेला हा विशेष श्लोक आहे. दत्तस्तवम्‌ हे एक अष्टकम्‌ (आठ श्लोकांचे स्तोत्र) आहे. ह्या अष्टकम्‌मधील हा शेवटचा श्लोक आहे. प्रार्थनेतून मानवाने काय मिळवण्याचा प्रयत्न करावा ह्याचे स्पष्टीकरण ह्या श्लोकात दिले आहे.

जन्म संसार बंधग्नम्‌ स्वरुपानंद दायकम्‌।
निश्रेयस पदम्‌ वंदे स्मर्तृगामी सनोवतु।।

ह्या अगोदरच्या श्लोकात आपण प्रार्थना केली की दु:ख / अडचणी नाहिशा होऊदे आणि आम्हाला सुखसोयींचा आशीर्वाद दे. ह्या जीवनास पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी आत्मसमर्पणाच्या भावनेने परमेश्वरास प्रार्थना करावी, “हे परमेश्वरा, वारंवार येणारे जन्म-मृत्यूचे चक्र माझ्यासाठी बंधन झाले आहे, कृपया ह्या बंधनातून मला मुक्त करा.

थोडा वेळ हसणे, थोडा वेळ शोक करणे हे ह्या संसाराचा भाग आहे. एका सेकंदाला आपण आनंद घेत असतो आणि दुसऱ्या सेकंदाला उदास असतो. कधी कधी आपण म्हणतो आयुष्य खूप चांगले आहे तर इतर वेळी त्यास ओझे आहे असे म्हणतो. जीवन पूर्णपणे चढ उतारांनी भरले आहे आणि ते आपल्याला पूर्णपणे बांधून ठेवते.

जन्म संसार बंधग्नम्‌ - दत्त भगवान आपल्याला वारंवार येणाऱ्या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो.

हे जन्माचे अखंड चालू असलेले चक्र आहे. ही कधीही न संपणारी परंपरा आहे. हा संसार एक स्वयंचलित यंत्र आहे. अशी कोणतीही यंत्रणा नाही की तिच्यामुळे हे थांबू शकेल. हे मशीन कधीही कमजोर होत नाही किंवा कधीही बंद पडत नाही, म्हणून ते अविरतपणे फिरत राहाते. कधीही न संपणाऱ्या साच्यातून एकामागोमाग एक असे जन्म घेतले जातात. आपण अविरतपणे प्रवास करत आहोत. ह्या जन्मी आपण इथे जन्म घेतला आहे. इतर जन्मात आपण वेगवेगळ्या पालकांच्या पोटी वेगवेगळ्या देशात जन्म घेतला आणि वेगवेगळ्या भाषा बोललो. काही वेळी आपण मूक प्राण्याचा जन्म घेतला.

थोड्या काळासाठी पृथ्वीवर असताना आपण तेवढ्यातच ओढ / आसक्ती निर्माण करतो. एक दोन आठवड्यापूर्वी ज्यांचा विवाह झाला आहे ते एकमेकांपासून अविभक्त असल्याचा दावा करतात. ही माया नाही तर काय आहे? प्रत्येक जीवनकालात ते वचन देतात की आम्ही कधीही विभक्त होणार नाही पण तरीही एका मुलाच्या जन्मानंतर ते घटस्फोट देण्यास तयार असतात. हे चांगले आहे का? परमात्म्याच्या योजनेनुसार दोघेजण एकत्र आले होते ते अशा प्रकारे कसा विचार करू शकतात?

आपल्या भावना तात्पुरत्या आणि क्षणभंगुर असतात. खरं प्रेम आणि भावना नसतात. खऱ्या भावनांची जागा ‘आभारी आहे ‘(Thank You) ह्या शब्दाने घेतली आहे. प्रत्येक क्षुल्लक मदतीसाठी पती पत्नीसुद्धा एकमेकांचे आभार मानतात. खरे प्रेम कुठे आहे?

ही माया (भ्रम) आहे. त्या भगवानांकडेच फक्त आपल्या जन्माच्या आकडेवारीची नोंद आहे. दत्तात्रेय भगवानांकडे गतिरोधक ब्रेक्स आहेत. त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल आहे. त्याद्वारे ते हे चक्र थांबवू शकतात. ही त्यांची महती आहे.

सर्वसाधारणपणे लोक असा विचार करतात की संसार म्हणजे लग्न करणे आणि जीवनातील चढ उतारातून जाणे. परंतु खरं तर जन्म घेणे हाच संसार आहे. हा संसार अकल्पनीय अतिविशाल वृक्ष आहे. त्यास अनंत फांद्या आहेत. अगणित फळं आणि फुले त्याला लागली आहेत.

रमण महर्षींनी सांगितले आहे, “जन्माची पुनरावृत्ती हाच कॅन्सर आहे.’’ हे किती धोकादायक आहे त्याची कल्पना ह्यावरून येईल.

हे जीवन ब्रह्मचाऱ्याचे असो. गृहस्थाचे किंवा संन्यासी व्यक्तीचे. हा जन्म हा संसार आहे. हा संसार जो आपल्या नियंत्रणाखाली नाही त्यात आपण बंधने जोडतो आणि समस्या खरेदी करतो. आपण ऐहिक संसाराबाबत चिंता करतो आणि त्यापेक्षा मोठ्या संसाराविषयी विचार करणे विसरतो. अरे! मला मुले नाहीत. मी पुरेसा फायदा मिळवला नाही. अशा प्रकारे तात्पुरत्या संसाराच्या क्षुल्लक चिंता आणि बंधन आपला वेळ खातात. आपणच ते आपल्यावर ओढवून घेतले आहे आणि देवावर दोष ढकलण्याचा प्रयत्न करत आहोत . देवाशी वादविवाद करण्याचा प्रयत्न कधीही करू नका. तुम्ही दिले म्हणून मी अडकलो. ते म्हणतील, तू मागितलेस म्हणून मी तुला दिले. त्याच वेळी काही साधक असे असतात की त्यांची मागणी असते की ते कधीच मरू नयेत आणि हि मागणी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात हे चुकीचे आहे. पुनर्जन्मापासून वाचण्यासाठी साधक प्रार्थना करू शकतो. परंतु त्याने मृत्यूपासून सुटकेची मागणी कधीही करू नये. तो निवडेल किंवा नाही परंतु मृत्यू हा अपरिहार्य आहे. म्हणून पुनर्जन्मापासून वाचणे ही प्रार्थना योग्य आहे. बऱ्याच काळ जगल्यानंतर जीवीस आयुष्याचा कंटाळा येतो मग आपण ह्या शरीरात ६००-८०० वर्षे जगण्याचा प्रयत्न कसा करू शकतो? नामदेवांनी प्रार्थना केली होती; हे प्रभू, मला तर पुनर्जन्म घेण्याची गरज असेल तर मी साधकांमध्ये जन्म घेईन ह्याची खात्री करा. मला तुमचे स्मरण करण्याची संधी हवी आहे. ऐषआराम उपभोगण्यासाठी फक्त पुनर्जन्म मागू नका. जन्मल्यानंतर हे आयुष्य परमेश्वरसेवेत घालवा. `हे प्रभु! प्रत्येक जन्मात मला तुझा सेवक कर. जोपर्यंत मी तुझा उत्कट सेवक असेन तो पर्यंत मी किती जन्म घेईन हे महत्त्वाचे नाही.’’ अशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे.

जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत पुनर्जन्म मिळविण्याचा प्रयत्न करू नये. जन्मच जीवीस बांधून ठेवतो. मृत्यू जीवीस कधीच बांधून ठेवत नाही. आपण जन्माला येण्याचा निर्णय घेतला म्हणूनच सर्व बंधनांस सुरुवात झाली. साधना, दृढ निश्चय आणि चांगली संगत ह्याने वाईट सवयींवर मात करता येते. परंतु जन्म हे बंधन सहजपणे कापता येत नाही.

आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी ही अवस्था प्राप्त करणे अशक्य असते. फक्त दत्तात्रेय भगवानच ती थांबवू शकतात. म्हणूनच ही अवस्था आपल्याला प्रदान करण्याची आपण त्यास विनवणी करावी.

स्वरूपानंद दायकम् : तो परमानंदाचा वर्षाव करतो, जो आपला खरा अंतर्मनातील परम आनंद आहे. जेव्हा जन्म नावाचे बंधन तोडले जाते, तेव्हा उरलेला सर्व आनंद (परमानंद ) असतो , जी प्रत्येक जिवीची खरी मूळ अवस्था असते.

जेव्हा गोड आंबा चाखला जातो तेव्हा जीभेस एक अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. ती व्यक्ती स्वत:ला खूप वेळ त्या आनंदात बुडविते. चांगल्या संगीताने कानास दिव्य आनंद प्राप्त होतो. जेव्हा दुसरी व्यक्ती तुमची खूप प्रशंसा करते तेव्हा मन आनंदात भिजते. हे सर्व माझ्या बुद्धिमत्तेमुळे/ क्षमतेमुळे झाले. माझी क्षमता ओळखल्याबद्दल आभारी आहे. किमान तुम्ही मला ओळखलेत तरी असं लोक म्हणतात. परंतु परमेश्वराने त्यांच्यामार्फत हे काम केले आहे हे सर्वसाधारणपणे लोक कबूल करत नाहीत. त्यातील भगवंताची भूमिका ते उघडपणे आणि मनापासून मान्य करत नाहीत. कोणीही असे म्हणत नाही, ``कृपया माझी स्तुती करू नका. परमेश्वराची स्तुती करा.

आपल्या अहंकारास उत्तेजन मिळते म्हणून आपण इतरांना आपली स्तुती करू देऊ नये. परंतु असा अहंकार वाढल्याने मनास आनंद होतो. आपण तीन प्रकारच्या आनंदांची चर्चा केली. जीभ, कान आणि मन ह्यांनी घेतलेला आनंद. जेव्हा मन आनंदाचा उपभोग घेत होतं तेव्हा जीभेने घेतलेला आनंद अस्तित्वात नव्हता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एक प्रकारचा आनंद उपभोगताना दुसऱ्या प्रकारचा आनंद अस्तित्वात असू शकत नाही. कान अन्नाचा कसा आनंद घेऊ शकेल? तशाच प्रकारे जीभ चांगल्या संगीताचा आनंद घेऊ शकत नाही. पाच इंद्रियांतील प्रत्येक इंद्रिय त्या वस्तूशी/ गोष्टीशी जोडले आहे. त्याचाच आनंद ते घेऊ शकतात.

आता ज्या माणसाने ‘स्व’ ची ओळख करून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्या बाबतीत काय होईल? ज्यावेळी त्याला त्याच्या सत्य स्वरूपाची जाणीव होईल तेव्हा त्यास जाणवेल की खरा आनंद हे त्याचे नैसर्गिक स्वरूप आहे. त्याक्षणी जेव्हा हा भ्रम आणि दु:ख नाहिसे होते तेव्हा त्यानंतर जे शिल्लक राहाते ते स्वत:चे सत्य स्वरूप आहे. हे आनंद स्वरूप आहे. केवळ वेगवेगळ्या पुराव्यांमुळे नाही तर थेट अनुभवाद्वारे त्याला समजते की आनंद हा त्याचा मूळ स्वरूप आहे.

दत्तभगवान आपल्याला ह्या अनुभवाच्या सर्वोच्च स्थितीत घेऊन जातात. म्हणूनच त्यांना स्वरूपानंद दायकम्‌ असे संबोधले जाते ते आपल्याला दाखवितात की आपले मूळ स्वरूप हा खरा आनंद आहे. आपल्याला आता हे समजले की आपले मूळ स्वरूपच आपल्याला आनंद प्रदान करतो. (आनंद दायकम्‌) निश्रेयस पदम्‌ – खरा आनंद मिळविणे म्हणजे निश्रेयस. दुसऱ्या शब्दात हि मुक्ती असते. हे मोक्ष, निर्वाण, कैवल्य, आत्मैक्य अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. आपण जोपर्यंत ह्या अवस्थेपर्यंत पोहोचत नाही. तोपर्यंत आपल्याला ह्याची ओळख/ ज्ञान होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर दत्त स्वत: `निश्रेयस’ ही अंतिम अवस्था आहेत. ते मुक्ती आहेत.

हे जरासे विचित्र वाटते, नाही का? दत्ताच्या उपासनेतून माणूस मुक्तीच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. हे वाक्य अर्थपूर्ण वाटते. परंतु दत्त भगवान स्वत:च मुक्ती आहेत असे स्पष्टपणे प्रकट कसे करता येईल?

आपण आपल्या प्रवासाच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी ट्रेनमध्ये चढतो. मग ट्रेन आणि अंतिम स्थान एकच असू शकेल का? असा लोकांना प्रश्न पडतो.

आता कुंभार मातीचे भांडं भाजतो. भांडं म्हणजे मातीच असते. इथे मातीचे भांडं बनले किंवा भांडं हे पण दुसरे काही नसून फक्त माती आहे. त्याचप्रमाणे दत्ताची उपासना करून माणूस स्वत:च दत्त होतो. ह्याला अहम्‌ग्रहोपासना म्हणतात. ह्या अवस्थेस पोचण्यासाठी त्या व्यक्तीस दत्त उपासना करावयास सांगतात.

उपनिषदात असे सांगितले आहे, सदा दत्तोह अस्मीति… ह्याचा अर्थ आपण दत्त आहोत असा ज्याचा विश्वास असतो आणि ह्या दृढ विश्वासाने तो प्रेमळपणे वागतो तो संसारी नसतो. इथे ह्याचा अर्थ असा लावावा की अशा लोकांना संसाराच्या चक्रातून (जन्म आणि मृत्यू) बाहेर पडण्याच्या भरपूर संधी असतात. आपण इथे असे समजून घेतले पाहिजे की जी व्यक्ती मी दत्त आहे ह्यावर विश्वास ठेवते आणि त्या दृढ विश्वासाने उपासना करतो त्यास मुक्ती मिळण्याची संधी असते. ज्याप्रमाणे कीटक पूर्ण भीतीने आणि एकाग्रतेने भ्रमराचे निरीक्षण करतो आणि त्या कीटकाचेच रूपांतर भ्रमरात त होते त्याचप्रमाणे प्रत्येक मिनिटास दत्त उपासना करणाऱ्या व्यक्तीचे रूपांतर दत्तात होते.

त्याचा आत्मा दत्त बनतो. तो परमात्मा स्वरूप बनतो. ही अवस्था न संसारी’ किंवा मोक्ष आहे असे उपनिषदात सांगितले आहे. ह्या उपनिषदेतील विधानावरून आपल्याला असे समजते की दत्त बनणे’ आणि मुक्ती मिळवणे हे एकच आहे. मातीचे रूपांतर जसे भांड्यात, इतर वस्तूत होते तसेच रूपांतर दत्त उपासकाचे दत्तात होते. जेव्हा मातीच्या भांड्यातील कोणताही भाग तुटतो, तेव्हा तो मातीत विलीन होतो. राहते ती फक्त माती. त्याचप्रमाणे मानवाच्या खूप धारणा असतात . उदा. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. मी राजा आहे, मी सेवक आहे इ. जेव्हा त्याच्या पूर्वीच्या सर्व कल्पना, समज, धारणा नष्ट होतात तेव्हा उपासक दत्तात एकरूप होतो. ज्यातून तो उत्पन्न झाला त्यातच तो विलीन होतो. फक्त दत्त रहातो. ह्यास मोक्ष म्हणतात.

ह्या स्तोत्रातील (अष्टकम्‌) हा शेवटचा श्लोक आहे. हे अष्टकम्‌ सर्व प्रकारची दु:ख आणि अडचणींचा नाश करते. हा शेवटचा श्लोक मानवी जन्माच्या अंतिम गंतव्याचे स्पष्टीकरण देतो. वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार.

स्मर्तृगामी सनोवतु - स्मरण करताच तत्क्षणी प्रतिसाद देणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो.

Tags: