SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
दत्त स्तवम्‌ – श्लोक ५

ह्या श्लोकात काही खूप विशेष अर्थ स्पष्ट केले आहेत.

ब्रह्मण्यम्‌ धर्मतत्त्वज्ञम्‌ भक्त कीर्ति विवर्धनम् ǀ

भक्ताभिष्टे प्रदम वंदे स्मर्तृगामी सनोवतु ǀǀ

आपण सतत हे लक्षात ठेवावयास हवे की ह्या परमेश्वरास नाव नाही. दत्तात्रेय म्हणजे अत्रींची भेट’ आणि ते त्याचे नाव नाही. स्मर्तुगामी सनोवतु’ हेच त्याचे नाव आहे हे आपण समजून घ्यायला हवे. आपण त्यांचा विचार करताच ते प्रसन्न होतात. असं म्हटलं जातं की शिव हा अभिषेकप्रिय आहे. उदा. गंगाजलाने केलेला अभिषेक शिवास खूप प्रिय आहे. विष्णू अलंकारप्रिय आहे. विविध फुलांनी, पीतांबरांनी केलेली सजावट विष्णूस प्रिय आहे. दत्त हा स्मरण मात्र संतुष्ट आहे – त्याचे फक्त स्मरण केले तरी तो संतुष्ट होतो. जेव्हा आपण दत्ताचे स्मरण करतो तो तत्क्षणी प्रसन्न होतो. ह्या श्लोकात किंचित वेगळ्या पद्धतीने आणि सूक्ष्म पद्धतीने दत्त आपल्या भक्तांना कशी मदत करतो हे स्पष्ट केले आहे. ब्रह्मण्यम्‌ – जो ब्रह्माशी संमत/मैत्रीपूर्ण आहे, जो ब्रह्माचे कल्याण करतो, जो ब्रह्मास समृद्धी प्रदान करतो तो ब्रह्मण्य. दत्तात्रेय खरा ब्रह्मण्य आहे. मग ब्रह्मा कोण? ब्रह्म’ ह्या शब्दाचे खूप अर्थ आहेत. तपस, वेद, जाति, ज्ञान, सृष्टिकर्ता तसेच परमात्मा. म्हणूनच तपस्येच्या समृद्धीला जो कारक असतो तो ब्रह्मण्य: तपस म्हणजे ज्ञान, ध्यान, एकाग्रता आणि दृढनिश्चय ह्यांची आवश्यकता. उदा. कोणतेही कार्य चालू केल्यानंतर कार्यपूर्तीसाठी दर्शविलेला दृढ निश्चय आणि पूर्ण एकाग्रता म्हणजेच तपस. जो वेद साधना करतो आणि जो जीवींना ते श्रवण शक्य करतो, असा पण अर्थ ब्रह्मण्य याचा आहे. . ह्याचा संदर्भ अशा व्यक्तीसाठीसुद्धा आहे जो सर्व जातीच्या लोकांचे कल्याण करतो आणि जो इतरांना ज्ञान प्रदान करतो. तुम्ही असा प्रश्न विचाराल की ज्ञान कसे वाटता येते ? जेव्हा कोठलाही जीव ज्ञानासाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याने अशा प्रकारे आशीर्वाद द्यावा की त्यामुळे त्या माणसाच्या ज्ञानात भर पडेल. जो ह्या सृष्टी आणि सृष्टीकर्त्यासाठी अनुकूल असलेल्या मार्गावर चालतो तो ब्रह्मण्य आहे. परब्रह्माबद्दल कोणी जाणू शकले असेल तर त्याचा उल्लेखही ब्रह्मण्य असा केला जातो. वर वर्णन केलेली प्रत्येक व्याख्या ज्याला लागू आहे तोच खरा ब्रह्मण्य. ते दुसरे कोणीही नसून दत्तात्रेय भगवान आहेत. ब्रह्मा ह्या शब्दाने लगेचच गुरू ब्रह्मा ह्या शब्दांचे स्मरण होते. सदगुरूंमध्ये एकाच वेळी हे सर्व गुण दिसतात. ह्या कारणांसाठीच सद्‌गुरूंना गुरू ब्रह्मा असे संबोधित केले जाते. गुरूंना ब्रह्मा म्हणून का संबोधतात? कारण ते आपल्या भक्तांना वरील सांगितलेल्या ब्रह्मण्य ह्या शब्दाच्या अर्थाच्या एका किंवा सर्व अवस्थेतून आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊ शकतात. आपले गुरू शिवस्वरूपात आपली सर्व पापं नाहिशी करतात म्हणून आपण त्यांना गुरू देवो महेश्वरा असे संबोधित करतो. धर्म तत्त्वज्ञ - वर सांगितलेल्या सर्व कारणांसाठी ते धर्म तत्त्वज्ञ आहेत. मानव धर्माच्या ज्ञानात ते पारंगत आहेत. नेमून दिलेल्या धर्माचे पालन केले तर मानव काय काय प्राप्त करू शकतो ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. धर्मशास्त्रासंबंधित असलेल्या ग्रंथातील तत्त्वात ते प्रवीण आहेत. मानवाचा उद्धार करण्यासाठी कशाची गरज आहे? कोणते अंतिम सार/ध्येय ते प्राप्त करतात? हे त्यांना चांगले ज्ञात आहे. भक्त कीर्ति विवर्धनम: दत्तात्रेय हे पहिले गुरू (आदि गुरू मूर्ति) आहेत. अनंत काळापासून ते आपल्या भक्तांना धर्मतत्त्व आणि ब्रह्मतत्त्वाची शिकवण देत आहेत. आपल्याला आता ब्रह्म ह्या शब्दाचा अर्थ समजला आहे. सदाचरण किंवा धार्मिकतेच्या नियमांचा गट म्हणजे धर्म. सर्वकाळ हे ज्ञान ते आपल्या भक्तांना देऊन ते त्यांना कीर्तीचा आशीर्वाद देतात. सर्व वेळ त्यांचे लक्ष भक्तांच्या कीर्तीकडे असते. भक्ताभिष्ट प्रदम्‌ - आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ह्याची ते खात्री करून घेतात. त्यांच्या कीर्ती कारकाबरोबरच ते त्यांच्या मनात कित्येक जन्मांपासून असलेल्या इच्छा ते पूर्ण करतात. न्याय्य रीतीने जे देण्यास योग्य आहे ते देताना भक्ताच्या मनात आपल्याला जे पाहिजे ते मिळाले अशी भावना ते निर्माण करतात. अशा आभासातून ते त्यांचा उद्धार करतात. माझी ही मागणी १००% पूर्ण व्हायलाच हवी असे जो भक्त हट्टीपणे मागतो तो खरं तर भक्तच नसतो. जो आपल्या इच्छा पूर्णपणे परमात्म्यावर सोडून देतो तोच खरा भक्त असतो. भक्तांच्या मनात विविध इच्छा असतात, त्या सर्व पूर्ण करणे अशक्य असते. समजा खोलीत दोन रुग्ण आहेत आणि एकच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या रुग्णास स्वतंत्रपणे चालता यावे म्हणून ते इंजेक्शन देतात. दुसरा रुग्ण जो अजून अंथरूणात आहे तो मलासुद्धा तेच उपचार पाहिजेत असे मागू शकतो का? आजार वेगळे असल्याने उपचार पण वेगळे असतात. निरोगी होण्यासाठी दुसऱ्या रुग्णास आणखी काही दिवस अंथरुणात राहावे लागणार असते . डॉक्टर अन्याय करतात अशी तक्रार तो करू शकत नाही. माझ्या गुरूंनी त्या माणसास संपत्तीचा आशीर्वाद दिला. त्यास सर्व काही दिले. ह्या माणसाकडे पाहा. पूर्वी हा माणूस इतका अज्ञानी होता, गुरूंनी त्याचे परिवर्तन पंडितात केले. इतर भक्तांना पाहून अशी तुलना करणे चुकीचे आहे. त्यांना त्या उपचाराची गरज आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. त्यांचे कर्म त्या पद्धतीने लिहिले आहे. तेथूनही त्यांना खाली आणले जाईल. तिथेपण त्यांना अडचणींना (तापत्रय) तोंड द्यावे लागेल. त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही. कालानुसार आणि परिस्थितीनुसार ज्याची गरज आहे किंवा ज्याची इच्छा केली आहे ते ते प्रदान करतात. . त्याचवेळी त्यांना जे हवे ते प्राप्त झाले असा आभास ते त्यांच्या मनात निर्माण करतात . काहीजण असा विचार करतात. माझ्या इच्छा महत्वाच्या नाहीत. त्यांना जे हवे असेल ते ते मला देऊ दे. हे खरे भक्त असतात. असे भक्त म्हणतात कि अशी इच्छा मनात बाळगली ही माझ्याकडून चूक झाली. कृपया मला माफ कर आणि तुमच्या इच्छेनुसार करा. कदाचित माझ्या नशिबात इतकेच असेल. मी मोठ्या अपेक्षा का बाळगू? आता मला जे मिळाले त्यात मी संतुष्ट आहे. अशा प्रकारे भक्तांच्या इच्छा पूर्ण करत परमेश्वर ज्ञान प्रदान करतो. ब्रह्मज्ञान आणि धर्मज्ञानाच्या क्रियेतून तो इच्छापूर्ती करतो. आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्याची दत्तात्रेय भगवानांची ही एक पद्धत आहे. किती विस्मयकारी पद्धत आहे. वंदे - अशा परमेश्वरास आमचा नमस्कार स्मर्तृगामी सनोवतु - स्मरण करताच तत्क्षणी प्रतिसाद देणारा परमेश्वर आपल्या सगळ्यांचे रक्षण करो. कोठल्याही परिस्थितीत `स्मर्तृगामी मनोवतु: हे महत्त्वाचे शब्द विसरू नका.

Tags: