SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 25 Dec 2020
भज गोविंदम् 0८: देवावर लक्ष केंद्रित होण्यासाठी मनास प्रशिक्षण द्यावे (श्लोक ७)

बाल स्तावत् क्रीडासक्त: तरुण स्तावत् तरुणीसक्त :।
वृद्ध स्तावत्-चिंतासक्तः परमे ब्रह्मणी कोपी न सक्त: || ७||

अर्थ - बाललीला आणि इतर अवखळ क्रियाकलापांची आसक्ती बालकांना असते. तरुण माणसास स्त्रीची आसक्ती असते. वयस्कर लोक कायम चिंतेत मग्न असतात. परंतु कोणालाही परमेश्वराची आसक्ती नसते.

या स्तोत्रात उल्लेख केलेला बालक, तरूण आणि म्हातारा माणूस एकच असून त्याच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्याचा उल्लेख केला आहे. मनुष्य प्रामुख्याने वाढीच्या चार टप्प्यांमधून जातो - बाल्य, कौमार्य, यौवन आणि वार्धक्य.

ह्या श्लोकात मानवी आयुष्य पूर्णपणे वाया कसे जाते ह्यावर प्रकाश टाकला आहे.

बालपणात, मन अद्याप पूर्णपणे परिपक्व झालेले नसते. ते खेळ आणि इतर बाळ लीलांकडे आकर्षित होते. त्यानंतर संपूर्ण कौमार्य अभ्यासात जाते. यौवनात जेव्हा शरीर आणि मन दृढ आणि सामर्थ्यवान असते तेव्हा अहंकार, मद , वासना आणि इतर इच्छा ह्यामुळे ते पीडित असते. या टप्प्यावर तो आपल्या वडिलधाऱ्यांकडे दुर्लक्ष करतो, त्यांचा अनादर करतो. तो दुष्कृत्यात त्याचा वेळ वाया घालवतो. जेव्हा वृद्धावस्था येते, तेव्हा शरीर कमजोर होते आणि सहकार्य करत नाही. दुर्बल आणि असहाय्य झाल्यानंतर आपल्या गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहायला लागते. तरीसुद्धा, मनावर राज्य करणाऱ्या इच्छा त्याला सतत छळत राहातात. राग आणि दु:ख त्याच्यावर राज्य करून त्याच्यावर मात करतात. हे सर्व लादले गेल्याने त्याला त्रास होतो. प्रशिक्षणाच्या अभावामुळे, मन देवाबद्दलचे विचार मनात आणण्यास नकार देते.

या जगातील प्रत्येक माणूस आपले संपूर्ण जीवन भौतिक समृद्धीसाठी(अर्थ) आणि वासना, इच्छापूर्तीसाठी (काम)वाया घालवितो परंतु धर्म (धार्मिकता) आणि ईश्वर चिंतनात त्यास थोडापण रस नसतो.

महर्षि वेदव्यास आपले दोन्ही हात उंचावून रडले आणि लोकांना उद्देशून त्यांनी सांगितले, “माझ्या प्रिय बंधूनो, धर्माचे पालन करून अर्थ (ऐहिकता) आणि कामाची प्राप्ती केली जाऊ शकते. कृपया माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. धर्माच्या मार्गावर चालण्याविषयी कोणतीही व्यक्ती थोडेपण समर्पण का दर्शवित नाही? ”

बाल्यावस्था, यौवन आणि वार्धक्य अशा तीन मुख्य टप्प्यातून माणूस जातो. या व्यतिरिक्त, इतर बऱ्याच मधल्या अवस्थादेखील आहेत. तथापि, सर्वात महत्त्वपूर्ण मानसिक बदल आणि सर्वात महत्वाचे संबंध या तीन टप्प्या दरम्यान तयार होतात आणि म्हणूनच ते जीवनातील सर्वात महत्त्वाचे टप्पे मानले जातात.

शैशव आणि बालपणात, ते वडिलधाऱयांच्या आज्ञांचे पालन करतात. ते करत असताना त्याने आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा पाया मजबूत केला पाहिजे. प्रह्लाद हे याचे उत्तम उदाहरण आहे. आपले गुरू ऋषी नारदांकडून आलेल्या सूचनांचे अनुसरण करत प्रल्हादाने आपला संपूर्ण वेळ भगवान नारायणावर ध्यान करण्यात घालवला आणि शेवटी त्यास साक्षात्कार झाला.

तारुण्याच्या काळात, त्या व्यक्तीने बालपणात शिकलेल्या गोष्टींचे स्मरण ठेवून इंद्रिय निग्रह ठेवून पुढे जात रहावे . अशांत मनोविकारांचा हा एक टप्पा आहे. ही अशी अवस्था आहे ज्यात व्यक्ती एकतर यश मिळवते किंवा अपयश. प्रसिद्ध कवी कालिदास यांनी सांगितले होते की मोहात पाडणार्‍या वस्तूंनी वेढला गेलेला असतानाही विचलित होत नाही तो खऱ्या अर्थाने धैर्यवान असतो.

धैर्य किती प्रमाणात असणे आवश्यक आहे? पुरुरवाची कथा याचं एक उदाहरण आहे. पुरुरवा एक महाज्ञानी माणूस होता. त्याला तारुण्य आणि म्हातारपण यातील फरक इतका जाणवले नाही म्हणून त्याने त्याचे तारुण्य त्याच्या वडिलांना, ययातीस दिले आणि त्याबदल्यात त्यांचे वृद्धत्व स्वीकारले.

तारुण्यानंतर येणारे वृद्धत्व हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. या अवस्थेत, व्यक्तीने आदर्श जीवन जगले पाहिजे आणि इतर तरुण पिढ्यांसाठी एक उदाहरण दाखवून दिले पाहिजे. म्हणून या टप्प्यावर, प्रत्येक पावलावर जागृत राहून कृती केली पाहिजे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना फायदा होईल हे लक्षात घेऊन वृद्धांनी आपला वेळ शांतपणे घालवावा. आपल्या जीवन पद्धतीतून अनुभव निर्माण होतात. आपण हे समजले पाहिजे की आपले गुण आणि वैशिष्ट्ये यांचे अनुकरण तरुण पिढी करत असते. जुन्या लोकांनी राईचा पर्वत करणे थांबवून अति चिंतेमुळे आणि तणावामुळे रोग ओढवून घेणे थांबवावे प्रत्येक क्षुल्लक कारणासाठी त्यांनी रागावणे थांबवले पाहिजे. सर्व प्रकारच्या आजारांवर उपाय म्हणून आपला वेळ भगवंताच्या ध्यानात घालवावा . ह्यामुळे व्यक्ती आपण वृद्धापकाळातून जात आहेत हे सुद्धा विसरतात!

विष्णुदत्त हे याचे उत्तम उदाहरण आहे. या पवित्र जोडप्यास संतती नव्हती. परंतु त्यामुळे ते चिंतीत नव्हते. कोणतीही इच्छा मनात न बाळगता ते शांत आणि समाधानी जीवन जगत होते. एकदा भगवान दत्तात्रेय जेव्हा विष्णुदत्तसमोर प्रकट झाले आणि त्यांना कोणतेही वरदान मागावयास सांगितले, तेव्हा विष्णुदत्तने उत्तर दिले की त्यास कोणतीही इच्छा नाही. या पवित्र जोडप्याच्या मुग्ध भक्तीमुळे दत्त भगवान आश्चर्यचकित आणि आनंदित झाले. कोणत्याही मानवाच्या मनात असलेली अंतिम इच्छा - मुक्ती याचा त्यांना आशीर्वाद दिला

Tags: