SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
भज गोविन्दं २: श्लोक १

भज गोविन्दम्‌ भज गोविन्दम् गोविन्दम्‌ भज मूढमते | सम्प्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रिञ्करणे ||

हे मूर्ख, अज्ञानी मानवा, (मूढ माणसा)! भगवान गोविंदाचा आदर कर आणि त्याचीच उपासना कर! तू सध्या कोणत्यातरी धड्यामधले व्याकरण पाठ करण्याचा जो काही अट्टाहास करत आहेस, तो काही तू मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असताना तुझ्या मदतीला, तुला वाचवायला येणार नाही! शंकर भगवद्-पादाचार्य आपल्या शिष्याला ‘मूढ-मते’ असे संबोधून आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. सामान्यतः मूढ हा शब्द मूर्ख व्यक्तीच्या संदर्भात बोलला जातो. तथापि वेदान्तानुसार, जी व्यक्ती मोहामध्ये आकंठ बुडाली आहे., ती ‘मूढ’ असते.

मोह म्हणजे आसक्ती! या मोहाच्या प्रभावामुळेच व्यक्तीला असा विश्वास वाटायला लागतो की तो म्हणजे इंद्रिये असलेले भौतिक शरीर आहे. याच विश्र्वासाने भारलेले असल्याने तो त्याच्या अंतरंगातील त्याचा खरा ‘आत्मा’ ओळखू शकत नाही. हा मोह आहे.

भ्रमात बुडालेल्या मानवाची उन्नती कशी होईल? त्याच्यासाठी कोणता मार्ग आहे? या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, व्यक्तीमध्ये ही वाईट इच्छा का निर्माण होते हे पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. आपली उपनिषदे आपल्याला अधिकारवाणीने हे सांगतात की आध्यात्मिक अज्ञान म्हणजेच अविद्या आणि भ्रम म्हणजे माया हीच यामागील कारणे आहेत. वेदान्ताच्या अभ्यासकांनी ठळकपणे हे सांगितले आहे की ‘आत्मतत्वाविषयी’ जे ज्ञान (विद्या) दिले जाते ते वगळता इतर सर्व प्रकारच्या ज्ञानांना अविद्या (अज्ञान) म्हणूनच वर्गीकृत केले जाऊ शकते. याच अनुषंगाने विचार केल्यास, अगदी 6 ‘वेदांगे’ जी वेदांचा अभ्यास करण्यासाठी तसेच वेद समजून घेण्यासाठी सहाय्यकारी ठरतात, ज्यांमध्ये व्याकरण यांसारखे ज्ञान समाविष्ट आहे, त्यांनादेखील ‘अविद्या’ असे म्हटले जाते. म्हणूनच, या स्तोत्रामध्ये शंकर भगवद् पादाचार्यांनी - आपल्या ‘स्व’वर, आत्म्यावर लक्ष केंद्रित करण्याकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी व्याकरणाची सूत्रे पाठ करण्यामध्ये जो पूर्ण वेळ वाया घालवितो, अशा व्यक्तीला आपल्या उपदेशाने फटकारले आहे. त्यांच्या दृष्टीने हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. अशाने मृत्यूच्या शेवटच्या घटकेला, मानवाच्या मनात त्या परमात्म्याबद्दल विचार येण्याऐवजी व्याकरणावरील हे धडेच आठवतील.

‘आपल्या मृत्यूच्या अंतिम क्षणी आपल्या मनाला त्या परमशक्तीच्या, भगवंताच्या विचारांनी भारून टाकणे’ हे जर आपल्या आयुष्याचे अंतिम लक्ष्य असायला हवे असेल तर आपले हे भौतिक शरीर तरुण, उत्साही आणि निरोगी असते तेव्हापासूनच ईश्वराचा नामजप सतत चालू ठेवणे आवश्यक आहे!

वरील श्र्लोकामध्ये ही मुख्य शिकवण दिली आहे याचा अर्थ, आपण इतर ज्ञानभांडार आणि शास्त्रवचने या सर्वांना निरुपयोगी ठरवत बाद करून टाकावे असा होत नाही. तर या सर्व शास्त्रांचा, ज्ञानाचा उपयोग त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे साधन म्हणून केला पाहिजे. याप्रकारे मानसिकता ठेवून त्यांचा अभ्यास निश्र्चितच केला जाऊ शकतो. परंतु अंतिम ध्येय मात्र केवळ ‘आत्म तत्वाची’ अनुभूती घेणे, आत्म्याचे तत्त्व समजून घेणे हेच असले पाहिजे. असा एक माणूस होता ज्याने आयुष्यभरात कधीही देवाबद्दल कोणत्याही प्रकारचा विचारदेखील केला नाही. मृत्युसमयी शेवटचे श्वास मोजत असताना त्याने थोडेतरी पुण्य कमवावे या भावनेने त्या माणसाच्या नातेवाईकांनी, त्याने परमेश्वराचे नाव घ्यावे यासाठी खूप धडपड केली. परंतु त्यांच्या या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. अंतिम उपाय म्हणून त्यांनी एक भांडी घासण्यासाठी वापरली जाणारी घासणी आणली आणि त्याला त्याचे नाव सांगायला सांगितले. त्यांना आशा वाटत होती की तो ‘नार’ म्हणेल, जे भगवान नारायणाचे अर्धे तरी नाव असेल आणि अशा प्रयत्नाने तो थोडेसे पुण्य जमा करेल. पण त्या माणसाने ‘पीचू’ हा सामानार्थी शब्द उच्चारला आणि तितक्यातच तो मरण पावला. ज्यांना लहानपणापासून कधीही देवाचे नाव घेण्याची सवय नसते त्यांची स्थिती अशीच असते. ‘भज गोविंदम्‌’ म्हणजे ‘त्या परमात्म्याचे खरे स्वरूप समजून घेणे / आपल्यात प्रतिबिंबित करणे’. ही संकल्पना आपल्या निर्ढावलेल्या मानवी बुद्धीमध्ये दृढपणे रुजवण्यासाठीच वरील श्र्लोकामध्ये ‘भज गोविंदम्’ ह्या शब्दांची तीन वेळा पुनरावृत्ती केली आहे . ‘श्रीमद् भागवत’ या पवित्र ग्रंथात असे म्हटले आहे की जेव्हा कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि गायींना संरक्षण दिले तेव्हा भगवान इंद्रांनी ‘गोविंद’ म्हणून कृष्णाची स्तुती केली. ‘गोविंद’ म्हणजे ‘गायींचा परमेश्वर, रक्षणकर्ता!’ खरे पाहता, ‘गो’ म्हणजे ‘ज्यांच्यामध्ये प्राण (जीवनशक्ती) आहे असे सर्वच प्राणी’. ‘भज गोविंदम्‌’ची निर्मिती कशी झाली? एकदा शंकर भगवद् पादाचार्य स्वामी गंगा नदीत स्नान करून परत येत असताना एका विद्वान शिक्षकाजवळून गेले. त्यावेळी त्यांनी पाहिले की ते शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्याकडून व्याकरणाच्या एका धड्यातील ‘डुकरिन्करणे’ हा शब्द घोकून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्या लहान मुलाला हा शब्द अचूकपणे म्हणता येत नव्हता आणि शिक्षक मात्र कठोरपणे प्रयत्न करतच होते. हे चालू असतानाच शिक्षकांच्या हातातील पाण्याचे भांडे खाली पडले. आणि घरंगळत जाणाऱ्या त्या पाण्याच्या भांड्यातूनदेखील ‘डुकरिन् करने, डुकरिन् करने’ असा आवाज निर्माण झाला. याचा अर्थ असा की या कठोर प्रयत्नांमुळे, पाण्याच्या भांड्यानेदेखील व्याकरणाचा हा धडा आत्मसात केला होता. हे पाहून, शंकर भगवद् पादाचार्य स्वामी खूप विचलित झाले. त्यांना वाईट वाटले की ही माणसे ‘आत्म तत्वाचा’ चा अभ्यास करणे पूर्णपणे विसरून गेली आहेत आणि केवळ अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या कार्याची पूर्तता करण्यासाठी धडपड, संघर्ष करीत आहेत. लगेचच त्यांनी ‘भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते’ हे भजन लिहिले.

या स्तोत्रामध्ये अंतर्भूत असलेले तत्त्वसार समजून घेण्यासाठी आता आपण पुढील श्लोकांकडे वळूया.

Tags: