SGS Putugam

SGS Puttugam

By Puttuadmin1 on 20 Dec 2020
००३ : हनुमानामध्ये विष्णू आणि शिव यांचे अंश आहेत!

हनुमानाच्या कथाभागातील सर्वांत विस्मयकारी अंश कोणता आहे? तर प्रत्येक त्रेता युगात (चार युगांमधील दुसरे युग) भगवान श्रीराम नव्याने अवतार घेतात. तथापि, हनुमान सर्व युगांत तोच असतो. हे आश्चर्यकारकच आहे, नाही का? रामाचे अवतारकार्य संपुष्टात आल्यानंतर काही काळ निघून जातो. पुढील युगामध्ये भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. काळाच्या ओघात, चारही युगांचा (चतुर्युग) कालावधी संपतो. पुन्हा एकदा चार युगांचा एक नवीन संच सुरू होतो ज्यामध्ये पुन्हा एकदा हे परमतत्त्व मत्स्य, नंतर कूर्म, वराह अशा प्रकारे अवतार धारण करत त्यानंतर आणखी काही अवतार घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्रेता युगाच्या दरम्यान श्रीराम म्हणून अवतार घेते. तथापि, हनुमान पुन्हा अवतार घेत नाही. सर्व युगांमध्ये तो एकच असतो. भगवान शिवांचा अवतार असलेला हा चिरंजीव आहे आणि म्हणूनच या परमेश्वराला चिरंजीवी असे संबोधले जाते. त्यामुळेच हनुमानाची जागा कोणीही घेऊ शकत नाही! जेव्हा जेव्हा भगवान श्रीहरी ‘श्रीराम’ म्हणून अवतार घेतात, तेव्हा हनुमान, जो अन्यथा अदृश्य स्वरूपात राहतो, तो एक दृश्य स्वरूप धारण करतो आणि सेवकाची भूमिका स्वीकारून रामाची आज्ञाधारकपणे सेवा करतो. हे खूप आश्चर्यकारक आहे परंतु परम सत्य आहे! पराशर संहिता आणि इतर अधिकृत प्राचीन ग्रंथांचा आधार घेऊन जेव्हा रामायणातील हनुमानाच्या कथेचा खोलवर जाऊन अगदी बारकाईने अभ्यास केला जातो, तेव्हा त्याचे हे अंश स्पष्टपणे समोर येतात. ‘अंजनेय’ या नावाच्या अर्थाचा सखोल अभ्यास केल्यानंतर हे स्पष्ट होते की हनुमानामध्ये केशव आणि शिव या दोहोंचे अंश आहेत. यावरून हे सिद्ध झाले आहे की भगवान केशव आणि शिव यांचे अस्तित्व अद्वैत आहे. ते दोघेही एकच आहेत! त्याच्या जन्माची घटना हे ठळकपणे सिद्ध करते, म्हणून ही घटना आपण अधिक तपशीलाने समजून घेऊया.

गर्दभासुर (गर्दभ म्हणजे गाढव) राक्षसाची हत्या. पूर्वी, गर्दभासुर नावाचा एक राक्षस होता. तो भगवान शिवांचा खूप मोठा भक्त होता. त्याने शंकरांकडून पुष्कळ वरदाने प्राप्त केली. वरदान मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड गर्व उत्पन्न झाला आणि त्याने चराचरातील सर्व जीवांना त्रास देणे सुरू केले. भगवान विष्णूंनी त्याचा नाश करण्यासाठी विविध पर्यायांचा वापर केला परंतु शंकराकडून वरदान मिळाले असल्याने ते सर्व अपयशी ठरले. शेवटचा उपाय म्हणून, सर्व देवदेवतांसोबत भगवान विष्णू भगवान शंकरांजवळ गेले आणि त्यांनी या राक्षसाचा नाश करण्यासाठी उपाय सांगण्याची विनवणी केली. काही वेळा लोक भगवंताकडून वरदान मिळाल्यामुळे घमेंडखोर बनतात. अशा वेळी भगवान शंकरच त्यांचा नाश करू शकतात. असे असल्याने, या प्रसंगी, भगवान विष्णूंच्या विनंतीनुसार, शंकराने काही क्षण विचार केला आणि नंतर विष्णूला उद्देशून ते म्हणाले, “तो माझा सर्वांत प्रिय भक्त आहे, तुम्ही कसे काय त्याला जिंकू शकाल? देवतांना छळ करणे ही एक बाब सोडली तर तो धर्ममार्गाचेच आचरण करतो आहे, नाही का? मी माझ्या भक्ताचे कधीही नुकसान करणार नाही. मी त्याच्यावर अपकार करू शकत नाही.’’ हे ऐकून भगवान विष्णूंना प्रचंड राग आला आणि ते ओरडले, ‘‘हे परमेश्वरा!’’………..

Tags: